Sunday, August 1, 2010

एक छोटीशी पोस्ट

"माझ्या ब्लॉगला नुकतंच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्द्ल ही एक छोटीशी पोस्ट !!!"


-अजय

Friday, July 23, 2010

शुन्य

बरयाच वेळा असं होतं की आभाळ भरुन येतं, सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडाडतात, पावसाचे सुरुवातीचे चार थेंब पडतात आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो. पण एवढं होऊनही पाऊस मात्र येत नाही. काळे ढग न बरसताच तसेच पुढे निघून जातात. आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने पहात बसतो. कोरडेच ढग ते, त्यांना ओलावा काय समजणार ? माझंही गेले काही दिवस त्या काळ्या ढगांसारखंच होत होतं. विचार डोक्यात भरून यायचे पण लिहिण्याची उर्मीच येत नव्हती. बरसल्याशिवाय मो़कळेपण नाही आणि बरसायला वातावरण साथ देत नाही. मी दर वेळेस असाच ब्लॉग उघडून न बरसताच निघून जायचो. कधी अगदीच खाली तर कधी थोडे फार शिंपडून. मी पण त्या पावसासारखाच, आला आला म्हणून वाट पहायला लावणारा. दोघेही...कधी सुके सुके आणि कधी बरसून ओले. आज मात्र तो बेभान होऊन बाहेर बरसतोय, काळ्या डांबरी रस्त्यावर उतरून तो नाचतोय, खाच-खळग्यात भरून तो ओसंडून वाहतोय, पानां-फुला-झाडावरती थेंब बनून पसरतोय. समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्यांना दाखवत फिरतोय. त्या पावसाचं पाहून मग मी ही ठरवलं की आपण ही आज असंच मनसोक्त, मनमुरादपणे बरसायचं, मनाच्या तंबोरयाच्या तारांना आज हलकंच छेडायचं, कानाच्या पडद्यांना थोडावेळं बंद करून जे काही सुर निघतील त्यांना अलगदच कागदावर उतरावयचंय, शब्दावाटे पसरायचं आणि एक विचार म्हणून रुजायचं. काल तो कुठेच नव्हता, आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. माझंही असंच आहे, काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय. तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ? आव्हानांशिवाय आयुष्याला मजा नाही हे अगदी खरं. देवापुढे मी जेव्हा डोळे मिटून, हात जोडून उभा राहतो तेव्हा मी कधीच मला गाडी, बंगला, ए॑शोआराम असलं काहीच मागत नाही. माझं नेहमीचं एकच मागणं असतं आणि ते म्हणजे देवा मला दररोज नवनवीन आव्हानं दे. प्रगती जर साधायची असेन तर आव्हानांचा मुकाबला करण्याशिवाय पर्याय नाही. मला बाकी काही नको, तू मला फक्त दररोज एक शुन्य दे, त्यातून पुन्हा सगळं काही उभारायचं काम माझं. देवा, ए॑कतोयस ना तू ?

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Saturday, April 3, 2010

सुख की समाधान

बरेच दिवसानंतर लिहायला बसलो आणि कागद पेन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. कामाचा ताण, भावनांचा कल्लोळ, खांद्यावरच्या जबाबदारया आणि डोळ्यांमधील स्वप्नं या सगळ्यांचा मेळ घालता घालता मी कधी तरी स्वताला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेपर्यंत नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती, पण तो त्यांचंच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग ३ बीएचके फ्लॅट, फिरायला एक मोठी कार, आठवड्यातून दोन-तीनदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन तीन वेळा कुठेतरी पिकनीक एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. माणूस जेवढया प्रमाणात कमावतो तेवढ्याच प्रमाणात तो त्याचे खर्च ही वाढवत असतो, त्याच्या गरजा ही तशाच वाढत असतात. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण कुठेतरी हे सगळं करताना आपण आपल्या आजुबाजुचे लोक, मित्र, सगे सोयरे एवढंच काय आयुष्यातले छोट्छोटे आनंद ही विसरून जातो. कित्येक दिवस झालं मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन करुन अगदी मनमोकळं बोललो नाही, क्रिकेटची बॅट किंवा बॅडमिंटनचं रॅकेट हातात घेऊन खेळायला गेलो नाही, एखादा सिनेमा, नाटक किंवा गाण्याच्या मैफिलाचा प्रोग्राम पाहिलेला नाही. एवढंच काय कित्येक दिवस मी साधा रस्त्यावरुन स्वताच्याच तंद्रीत अगदी शांतपणे एकेक पाऊल टाकत साधा चाललो पण नाही. मी मिस करतोय... मित्रांबरोबर कट्यावर बसून निवांत मारलेल्या गप्पा, टेरेसवर झोपून मोजलेल्या चांदण्या, विमानांचा आवाज ए॑कून लहानपणी केलेला जल्लोष, रात्र रात्र बसून वाचलेली कादंबरी, आठवड्यात एकदाच लागणारा रविवारचा सिनेमा पाहण्यासाठी केलेली धडपड, गल्लीतलं क्रिकेट आणि चोरलेल्या कैरया, गोट्यांचा डाव आणि शाळेतली भांडणं, डब्यातला आईच्या हातचा मलिदा आणि सायकलीवरचं हुंदडणं, पहिलं प्रेम आणि आयुष्यातली पहिलीच कविता आणि असंच बरंच काही...मी खरंच हरवून बसलोय.माणुस पैसा आनंद मिळविण्यासाठी कमावतो की आनंद गमावण्यासाठी हा प्रश्न मग मला सतावू लागतो. सुख मिळवायचं असेन तर ते भोगायला ही शिकलं पाहिजे आणि ते भोगण्यासाठी समाधानी वूत्ती हवी. सुख आणि समाधान या दोन भिन्न गोष्टी आहे असं माझं ठाम मत. पण तरीही सुखी माणसं समाधानी असतात की समाधानी माणसं सुखी हा मला अजूनही न पेललेला प्रश्न...

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, March 8, 2010

खरंच का "जय महाराष्ट्र"

या वर्षी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरा करतोय पण खरंच "जय महाराष्ट्र" म्हणण्यासारखा आहे का आपला महाराष्ट्र सद्य स्थितीला ?

१. गेली १५ वर्षे मी 'लोडशेडींग' हा शब्द ए॑कतोय. कित्येक सरकारं आली आणि गेली पण हा इतका महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकाही सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. गावामध्ये १५-१५ तास वीज नसते आणि आली तर ती रात्रीची येते. शेतकरी आत्महत्या करेन नाहीतर काय. शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही तिथे पाणी असूनही काय फायदा ना. देशाचे उर्जामंत्री हे महाराष्ट्राचेच सुपुत्र आहेत आणि गेली काही वर्षे ते उर्जामंत्री म्हणून काम करत आहेत. राज्य आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार असूनसुद्धा हा प्रश्न गेली १० वर्षे का सुटत नाही. लोकांना अंधारात ठेऊन काम करणारयांची हा प्रश्न सोडविण्याची तळमळ दिसत नाही, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

२. माझा शेतकरी बांधव हा कधी सावकाराच्या कर्जाखाली दबून तर कधी गरीबीने कंटाळून तर कधी मुलीच्या लग्नाच्या चिंतेने आत्महत्या करतोय. आपलं स्वताचं कुटुंब चालविण्यापुरताही त्याच्या हातात पैसा येत नाही. आपल्या शेतात पिकल्या गेलेल्या मालाला ठोस बाजारभावच जर मिळाला नाही तर तो पुन्हा पिकविण्याचं धाडस कसा करेन. आपल्या कच्च्या बच्च्यांना साधं दोन वेळचं जेवण देणं त्याला महाग होत चाललंय तर त्यांना बाकींच्यासारखी चांगली चुंगली कपडे, शिक्षण तो कुठुन देईन. महाराष्ट्राचा जाणता राजा असं ज्याला म्हणतात तो देशाचा कूषी मंत्री असूनसुद्धा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललयं आणि तो आकडा काही हजारामध्ये आहे ही शरमेची गोष्ट आहे, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

३. धान्यांचे भाव गगणाला भिडत असताना, दररोजच्या जेवणाची लोकांना भ्रांत पडत असताना आपलं सरकार धान्यापासून दारू बनविण्याच्या कारखान्याला परवानगी देऊच कसं शकतं. याउपर त्या कारखान्यांना ( जे यांचेच आहेत !) त्यांना सबसिडी पण आणि ती पण थोडीथोडकी नाही तर काहीं करोडोंमध्ये ? वाह...काय अजब कारभार आहे. लोकांना खायला अन्न नाही म्हणून दारु प्या. दारुपायी लोकांचे घरदार उद्धवस्त होत असताना त्याच दारुवर स्वताची पोळी भाजून घ्यायला लाज कशी वाटत नाही या नालायक लोकांना. ज्या गांधीजीनी दारुमुक्तीचा रस्ता दाखविला त्याच गांधीजीच्या कॉग्रेसमधली धेंड गांधी टोपी आणि खादी घालून लोकांना त्याच दारुच्यानादी लावायची काळी कामं करतात, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

४. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा फक्त ए॑कण्यापुरता शब्द राहिलाय आजकाल. झेंडा, शिक्षणाच्या आयचा घो सारख्या चित्रपटांना आणि काही नाटकांना विरोध, एका न्यूज चॅनेल वर हल्ला होणं ही सारी कशाची उदाहरणं आहेत. एखाद्याला आपलं मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. मिडीया हा लोकशाहीचा एक पाया आहे. मिडीयानेसुद्धा सवंग लोकप्रियतेच्या मागे न धावता स्वताची विश्वासार्हता वाढवावी पण मिडीयावर असे हल्ले होणं हे साहजिकच कुठल्याही लोकशाहीला शोभणारं नाही हे ही तितकंच खरं. असे हल्ले करुन गुन्हेगार इथे मोकाट फिरतात तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

५. २६/११ च्या मुंबई हल्ल्यावरुन आपण खरंच काय बरं शि़कलो ? त्याच्यानंतरपण आमची यंत्रणा तेवढीच ढिसा़ळ आहे हे पुणे हल्ल्यावरुन दाखवून दिलंय. काल मुंबई, आज पुणे, परवा अजुन कुठलंतरी शहर असं किती दिवस चालणार आहे. लोकांचं जीवन खरंच एवढं स्वस्त झालंय का की कुणीही येउन इथ दहशत पसरवुन जावं. आम्ही दुसरया दिवशी कामाला तेवढ्याच विश्वासाने बाहेर पडतो हे आमचं स्पिरीट नाही तर ती आमची गरज आहे आणि तसेही आम्ही निर्ढावलेले गेलोच आहोत. पोलिसांना लोकांच्या रक्षणापेक्षा नेत्यांचंच रक्षण करावं लागतंय. ज्यांच्याकडे दुसरया महायुद्धाच्या काळातल्या जुनाट बंदुका आहेत ते आपलं संरक्षण काय करणार. पोलिस खातं सक्षम कधी होणार, सागरी सुरक्षा बळकट कशी होणार, इथल्याच फितुर लोकांना कधी पकडलं जाणार, कसाब सारख्या अतिरेक्याला शि़क्षा कधी होणार आणि उद्याचा दिवस मला पहायला मिळेल की नाही या भितीपोटी जगणारयाला विश्वास कोण देणार असल्या प्रश्नांची उत्तर माहीत जरी नसली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

६. वय वर्षे दहा पासून ते अगदी इंजीनिअरींग, मेडीकल पर्यंतचे कित्येक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. उद्याचं भविष्य असलेली ही मुलं अशी आत्महत्या का करत आहेत? एवढा का त्यांच्यावरचा ताण असह्य होत चाललाय? त्यांच्या पाठीवरचं आणि डोक्यावरचं ओझं आपण कधी कमी करणार आहोत. एकाही मंत्र्याला निदान शिक्षणमंत्र्याला तरी याची दखल घेऊन काही करावंस का वाटत नाही? शाळा कॉलेजच्या फी, डोनेशन, शिक्षणातली स्पर्धा, नवीन वाटा याबद्दल खरंच काहीतरी करण्याची गरज आहे. जिथे या लहान मुलांची पण कुणाला दया येणार नसेन आणि त्यांचा जगण्या मरण्याने कुणाला फरक पडणार नसला तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

७. आमची शहरं ही दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. कुणीही कुठेही जाऊन रहावं तो अधिकार सर्वांचाच आहे तरीही या येणारया लोंढ्यांना आवर कुठेनाकुठे घातला गेलाच पाहिजे. स्थानिक व परप्रांतीय यांमधली दरी ही वाढत चालली आहे याचं मुळ कारण आहे ती स्थानिक लोकांच्या मनामधली असुरक्षितता. त्यासाठी स्थानिकांना प्रत्येक गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे यात गैर ते काय. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कुती, मराठी वा:डमय, मराठी कला यांची जपणूक ही जशी लोकांनी तशीच सरकारनेपण जाणीवपुर्वक केलीच पाहिजे. मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, ओळख आहे आणि ती शेवटपर्यंत टिकलीच पाहिजे अशा गोष्टींमध्ये मतभेद, मतमतांतर असली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, February 22, 2010

डायरीतला 'मी'

सुरुवातीला माझं लिखाण माझ्या शंभर पानांच्या डायरीपुरतंच मर्यादित असायचं. त्या डायरीमध्ये माझ्या दिवसभरातल्या घडलेल्या नोंदीपेक्षा मनात उठलेल्या तरंगांचंच प्रतिबिंब जास्त असायचं. आपण स्वतंच रुप जसं आरशासमोर तासनतास उभं राहून न्याहाळतो तसंच मग मी ही कधी वेळ मिळाला तर डायरीची पानं पाठीमागे नेऊन माझ्यातल्या हळव्या अशा 'मी' ला शोधायचो. एखाद्या क्षणी एखादी भावना आपल्यावर मात करते आणि मग आपण आपल्या मेंदूच न ए॑कता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती सांगेन तशी प्रत्येक गोष्ट करतो. कधी ती भावना प्रेमाची असेन तर कधी रागाची. कधी मित्रत्वाची तर कधी सुडाची. जिथून मनाचा वावर सुरु होतो ना तिथेच मेंदूचं राज्य संपलेलं असतं आणि त्या हद्दीच्या पलीकडे आपण फक्त त्याच्याच तालावर नाचत असतो. मी सुद्धा असाच मेंदू आणि मन दोन्ही असलेला एक सामान्य माणूस. मनाचं आणि मेंदूच द्वंद्व मी सुद्धा बराच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, अशी अनेक वादळं या डायरीच्या पानामध्येच शांत झाली. माझ्यातल्या घोंघावणारया वादळाला शमविण्याची ताकद या काळ्या पांढरया पानांमध्येच आहे. ऑफीसमधल्या कटकटी, नोकरीमधले चढ-उतार, नात्यामधली गुंतागुंत आणि स्वताची तत्त्व अशा प्रत्येक विषयावर मी या डायरीशी बोललो. कधी कुठल्या ट्रेकमधला थरार तर कधी कुठल्या पिकनीकमधल्या गमतीजमती, शिकलेला नवीन विषय तर फसलेली युक्ती मी माझ्या डायरीशी शेअर केली. तिने माझा रागही सहन केला आणि प्रेमसुद्धा अनुभवलं. थकून भागून घरी परतल्यावर चार ओळी काहीतरी नवीन लिहून नवनिर्मीतीचं वेडही तिनेचं लावलं. आयुष्यात प्रत्येकजणच धडपडतो पण अगतिक झाल्यावर उठून उभं राहण्यासाठी मला पुन्हा उद्दुक्त ही तिनेच केलं. मी तसा थोडा अबोलच, पण माझ्या मुखातुन श्रवणीय बोल बोलण्यास भाग मला या डायरीनेच पाडलं. डायरीने मला सुरुवातीला विचार करायला आणि नंतर मांडलेला विचार स्वतामध्ये रुजवायला शिकवलं. मला घडवलं ते माझ्या आई वडीलांनी आणि त्यांच्या संस्काराने पण मला अंर्तबाह्य बदलवून टाकलं ते फक्त माझ्या डायरीनेच. माझ्यामधल्या अनुभवाला आणि आत्मविश्वासाला जर कशामुळे बळ प्राप्त झालं असेन तर ते फक्त त्या दररोज डायरीमध्ये लिहण्याच्या सवयीमुळेच. या डायरीच्या प्रत्येक पानामध्ये मी कालची ढळलेली संध्याकाळ आणि उद्याची येणारी पहाट पाहतो. दमलेल्या जीवाला औट घटकाभर विश्रांतीसाठी मी या डायरीचाच आधार घेतो. हरवलेल्या अस्तित्वाला जपण्याचं काम मी या डायरीतच करतो. मला या डायरीच्या प्रत्येक पानावर माझं स्वताचं विश्व तयार करत जायचंय, पानाचा कोपरा न कोपरा मला माझ्या अस्तित्वाने भिजवून टाकायचाय म्हणूनच समासंच बंधन मी डायरीत पाळत नाही. जळते ती वात, पण प्रकाश देणारा कोण असं म्हटलं तर नाव मात्र दिव्याचं घेतलं जातं. माझ्या डायरीचंही असंच आहे, उजेड माझा पडला तरी कण कण जळणारी ती माझी डायरीच आहे !

(...डायरीच्या पानांतून)


-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, February 8, 2010

परीस की सोनं

आई सोडून सर्वात पहिल्यांदा जर मी कुठल्या स्त्रीकडे स्वताहून आकर्षित झालो असेन तर त्या म्हणजे माझ्या तिसरी इयत्तेतल्या बाई. तेव्हा माझं वय ते काय होतं फक्त ८ वर्षे. ते प्रेम नव्हतच मुळी ते होतं फक्त एक आकर्षण. प्रेम वगैरे समजायचं माझं तेव्हा वय ही नव्हतं. मला मात्र त्या बाई फार आवडायच्या. मला अजून ही आठवतंय त्यांच्या पिरीयडला मी अगदी मन लावून वर्गात बसत असे. त्यांचं एकेनएक वाक्य मी कानात साठवून ठेवत असे. त्यांच्या पुढे मागे करणं, पिरीयड संपल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना उगाचच प्रश्न विचारण, त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पुर्ण करण, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मन लावून करणं असे सगळे प्रकार मी त्यावेळी केले होते. अजुनही, खुप वेळा अगदी डोक्याला ताण देऊनही मला त्यांचा चेहरा आठवत नाही. आठवतं ते त्यांचे मंजुळ बोलणं, त्यांची ती शिकविण्याची पद्धत आणि त्यांचं ते प्रेमानं समजवून सांगणं. म्हणजेच मला त्यांच्या चेहरयाने कधीच भुरळ घातली नव्हती, त्यांच्या वागण्या बोलण्यानेच मला खूप इम्प्रेस केलं होतं. त्यामुळेच 'लव्ह अ‍ॅट फस्ट साईट' वर माझा कधीच विश्वास नाही. एका नजरेत जे होतं ते खरंच प्रेम असू शकतं का ? प्रेम निर्माण होण्यासाठी सहवासाची आवश्यकता नसते का ? आकर्षण आणि प्रेम या दोन तरल भावनांना वेगळं करणारी अजून एक अशीच भावना असते आणि तिला 'ओढ लागणे' असं म्हणतात. काही लोक या ओढीलाच प्रेम समजतात. माझ्या मते आकर्षणाचं रुपांतर अगोदर ओढीत आणि मग सहवास लाभल्यावर प्रेमात होतं.

या जगात देवाने सर्वात सुंदर अशी कुठली गोष्ट बनवली असेन तर ती म्हणजे 'स्त्री', 'नारी'. या माझ्या विधानावर समस्त पुरुषमंडळी एकसाथ हात वर करुन मला अनुमोदन देतील यात शंकाच नाही. स्त्री म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजेच स्त्री असं आतापर्यंतच समाजात रुळलेलं समीकरण. पण एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षित करते तेव्हा तिचं शरीर, तिचा चेहरा यापेक्षा अजून काही गोष्टी तुमच्या मनात नक्कीच घर करून बसतात. माणुस हा समोरच्याचा शरीराबरोबर जगतो की विचारांबरोबर ? समोरच्याचं शरीर त्याला आकूष्ट करतं की त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव ? चेहरयाबरोबर जगणारे मला माहीत नाही, मी विचारांबरोबर जगतो. ज्याचे विचार सडलेले आहेत त्याचं शरीर कितीही टवटवीत असला तरी काय फायदा ? कडुलिंब कितीही कडु असला तरी तो गुणकारी असतो, कोकीळ कितीही काळी असली तरी तिचा गोड गळाच लोकांना वेड लावतो, चकाकणारं सोनं प्रत्येकानेच पाहिलय पण परीस कसा दिसतो हे अजून कुणालाच माहित नाही. तरी पण त्याच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळेच तो सगळ्या जगात ओळखला जातोच ना. माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळेच तो ओळखला जातो, ना की त्याच्या बाहयरुपावरुन. समोरच्याला नीट ओ़ळखायचं असेन तर त्याच्या बाह्यररुपावर जाऊच नये, त्याच्या चेहरयामागचा रंग पहावा. उगाचच संत म्हणून गेले का "का रे भुललासी वरलीया रंगा...". अंगभर घालून मिरवायचं असेन तर सोनं घ्यावं आणि आपलं आयुष्यच बदलून टाकायचं असेल तर परीस जवळ बाळगावा. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला काय हवंय परीस की सोनं ?

-अजय

Tuesday, February 2, 2010

२ फेब्रुवारी

कालपासून पोटात फक्त मोसंबी ज्युस, एक कप कॉफी, नाना तह्रेचे प्रश्न व एक हुरहुर यांचंच वास्तव्य होतं. अजूनही त्या उपवासाचा शेवट झालेला नाही. आजचा दिवस हा बराच संमीश्र भावनांनी भरलेला होता. सकाळी पाच पासून मी अगदी आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कुणा ना कुणाशी बोलत होतो. लोकांना उत्तर द्यायची जबाबदारी नेहमी माझ्यावरच का येते ? मी खुप सारं खरं बोलतो हा माझा गुण की वैगुण्य ? पुरुषाला मन, भावना नसतात असं लोकांना का वाटतं ? मनाच्या कुठल्यातरी कोपरयात दडून बसलेले असले प्रश्न मग माझ्या मनाच्या पूष्ठभागावर येऊन हातात हात घालून नाचायला लागतात. मी ही त्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. काही गोष्टी अनुतरीत्तरच राहिलेल्या चांगल्या, उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यावरच किंवा सापडल्यावरच जास्त त्रास होतो असा माझा अनुभव. या जगात सर्वात मोठं जर कुठलं दु:ख असेन तर ते अपेक्षाभंगाच हे मी कुठतरी वाचलं होतं. पण त्यापेक्षाही जास्त मोठं दु:ख हे सदभावनेने केलेल्या कामावर, घेतलेल्या निर्णयावर शंका घेतली जावी (वपुंनी म्हटल्याप्रमाणे) हेच आहे असं आज वाटून गेलं. समोरच लोक असे चटकन बदलताना, त्यांचे स्वभाव इतक्या लवकर बदलताना पाहिल्यावर मी विश्वास ठेवलेला तो हाच का असं कुठंतरी वाटू लागतं. मी मात्र समोरच्यावरचा माझा विश्वास मात्र कधीच डळमळीत होऊ दिला नाही. ज्याला जीव लावला त्याला शेवटपर्यंत जीवच लावेन, ज्याच्यावर विश्वास ठेवला तेवढाच विश्वास कायम ठेवेन. म्हणूनच मला पराभूत होण्यापेक्षा हतबल होण्याचीच जास्त भीती वाटते. पराभव जिव्हारी लागतो आणि हतबलता माणसाला निराश करते. पराभव जिव्हारी लागलेला चांगला,माणूस जिंकण्यासाठी पुन्हा तयारीला तरी लागतो. पण हतबलता नैराश्य आणते. आणि आज मी असाच हतबल आहे.

(...डायरीच्या पानांतून)

-अजय