आई सोडून सर्वात पहिल्यांदा जर मी कुठल्या स्त्रीकडे स्वताहून आकर्षित झालो असेन तर त्या म्हणजे माझ्या तिसरी इयत्तेतल्या बाई. तेव्हा माझं वय ते काय होतं फक्त ८ वर्षे. ते प्रेम नव्हतच मुळी ते होतं फक्त एक आकर्षण. प्रेम वगैरे समजायचं माझं तेव्हा वय ही नव्हतं. मला मात्र त्या बाई फार आवडायच्या. मला अजून ही आठवतंय त्यांच्या पिरीयडला मी अगदी मन लावून वर्गात बसत असे. त्यांचं एकेनएक वाक्य मी कानात साठवून ठेवत असे. त्यांच्या पुढे मागे करणं, पिरीयड संपल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना उगाचच प्रश्न विचारण, त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पुर्ण करण, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मन लावून करणं असे सगळे प्रकार मी त्यावेळी केले होते. अजुनही, खुप वेळा अगदी डोक्याला ताण देऊनही मला त्यांचा चेहरा आठवत नाही. आठवतं ते त्यांचे मंजुळ बोलणं, त्यांची ती शिकविण्याची पद्धत आणि त्यांचं ते प्रेमानं समजवून सांगणं. म्हणजेच मला त्यांच्या चेहरयाने कधीच भुरळ घातली नव्हती, त्यांच्या वागण्या बोलण्यानेच मला खूप इम्प्रेस केलं होतं. त्यामुळेच 'लव्ह अॅट फस्ट साईट' वर माझा कधीच विश्वास नाही. एका नजरेत जे होतं ते खरंच प्रेम असू शकतं का ? प्रेम निर्माण होण्यासाठी सहवासाची आवश्यकता नसते का ? आकर्षण आणि प्रेम या दोन तरल भावनांना वेगळं करणारी अजून एक अशीच भावना असते आणि तिला 'ओढ लागणे' असं म्हणतात. काही लोक या ओढीलाच प्रेम समजतात. माझ्या मते आकर्षणाचं रुपांतर अगोदर ओढीत आणि मग सहवास लाभल्यावर प्रेमात होतं.
या जगात देवाने सर्वात सुंदर अशी कुठली गोष्ट बनवली असेन तर ती म्हणजे 'स्त्री', 'नारी'. या माझ्या विधानावर समस्त पुरुषमंडळी एकसाथ हात वर करुन मला अनुमोदन देतील यात शंकाच नाही. स्त्री म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजेच स्त्री असं आतापर्यंतच समाजात रुळलेलं समीकरण. पण एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षित करते तेव्हा तिचं शरीर, तिचा चेहरा यापेक्षा अजून काही गोष्टी तुमच्या मनात नक्कीच घर करून बसतात. माणुस हा समोरच्याचा शरीराबरोबर जगतो की विचारांबरोबर ? समोरच्याचं शरीर त्याला आकूष्ट करतं की त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव ? चेहरयाबरोबर जगणारे मला माहीत नाही, मी विचारांबरोबर जगतो. ज्याचे विचार सडलेले आहेत त्याचं शरीर कितीही टवटवीत असला तरी काय फायदा ? कडुलिंब कितीही कडु असला तरी तो गुणकारी असतो, कोकीळ कितीही काळी असली तरी तिचा गोड गळाच लोकांना वेड लावतो, चकाकणारं सोनं प्रत्येकानेच पाहिलय पण परीस कसा दिसतो हे अजून कुणालाच माहित नाही. तरी पण त्याच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळेच तो सगळ्या जगात ओळखला जातोच ना. माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळेच तो ओळखला जातो, ना की त्याच्या बाहयरुपावरुन. समोरच्याला नीट ओ़ळखायचं असेन तर त्याच्या बाह्यररुपावर जाऊच नये, त्याच्या चेहरयामागचा रंग पहावा. उगाचच संत म्हणून गेले का "का रे भुललासी वरलीया रंगा...". अंगभर घालून मिरवायचं असेन तर सोनं घ्यावं आणि आपलं आयुष्यच बदलून टाकायचं असेल तर परीस जवळ बाळगावा. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला काय हवंय परीस की सोनं ?
-अजय
बंदी घातलेली पुस्तकं..
2 hours ago
