Monday, January 18, 2010

काटकोन

"उठा आता. झोपायला काय वेळ काळ असतो की नाही. पाहूणे येतील आता, निदान त्यांच्यासाठी तरी थोडी आवराआवर कर.", मातोश्री.

डोक्यावरची उशी काढून, तोंड वासून मी आळस दिला आणि गेले ३ तास तोंडात अडकून पडलेल्या सहस्त्र कीटाणूंचा या जगातला प्रवेश निश्चीत केला. डोळे किलकिले करून दिशांचा अंदाज घेतला. झोपण्यापूर्वी माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी आता उजव्या बाजुला कशी आली, अंगावरची चादर खाली का वर सरकली, बेडशीटने गादीची साथ सोडून कडेलोट कसा केला आणि माझी लाडकी बिप्स आजही स्वप्नात कशी नाही आली या नेहमी पडणारया प्रश्राचं ओझं घेऊन मी उशीवरून मान वर केली. समोर आई ब्लॅक अ‍ॅड व्हाईट मध्ये आई काहीतरी बोलताना दिसत होती.

"आवराआवर कशासाठी आई. त्यांच्याघरी काय पसारा नसतो का गं. आणि एवढं सारं आवरल्यानंतर परत हे पुर्वीच्या जागेवर ठेवण्यासाठी मला किती त्रास होईन. माझी रुम कशाला कोण पहायला येतंय आणि आले तर आले. आय डोन्ट केअर".

मी माझं सारं काही १५ मिनीटांत आवरून खाली जातो.

"अरे इस्त्री का नाही केला शर्ट ला मागून ? "
"अगं टेकल्यावर तसाही चुरगळतोच ना !"
"आणि पुढूनही का नाही केलास ? "
"इनशर्ट करणार आहे म्हणजे दडला जाणार ना तो भाग :-)"
"आणि हो बाह्या दुमडणार आहे म्हणून बाह्या सुद्धा नाही केल्या आणि पॅन्टची मागची बाजूही नाही केली कारण ती बसल्यावर चुरगळतेच. मला नाही आवडत असं कडक राहणं. मी आहेच असा विस्कटलेला, चुरगळलेला."

असं सगळं कसं पद्धतशीरपणे करणं आपल्याला नाही बुवा जमत. सगळं कसं अगदी नीटनेटकं, कडक, करकरीत, नियमाला धरून. मी भानगडीत नाही पडत असल्या साचेबद्ध जगण्याच्या. आपल्याला तर प्रश्नच पडतो की लोक एवढं सारं साचेबद्ध आयुष्य कसं जगतात. यांचे नियम सुद्धा सुरु होतात अगदी भल्या पहाटेपासुनच, पहाटे ५.५ लाच उठणं, व्यायाम करणं, मग काहीतरी वाचन, मग १० मिनीटांत आंघोळ, मग एक सफरचंद, त्याच्याबरोबर कारल्याचा ज्युस, दोन ब्रेड, त्याला लावलेला बटर-जाम. सगळं कसं काटेकोर, नियमांत बसविल्यासारखं, एकदम शॉलीड अ‍ॅक्युरेट. झोप ६ तास, ऑफीस ८ तास, व्यायाम १ तास. रेष आखल्यासारखं लोक आयुष्य जगतात. नाही म्हणजे नाही, मुळीच जमणार नाही मला असलं काही. त्यामुळेच मला भूमिती हा विषयही कधीच नाही आवडला. लाईन या शब्दाला मी मुली वगळता बाकी कुठल्याही प्रांतात आणायचा प्रयत्न नाही केला. पोरींवरही लाईन मारली ती पण आडवी तिडवीच. प्लॅनींग वगैरे करण्याच्या बाबतीत त्या मुळेच मी कच्चा. लग्न केलं तर ते ४.३७ मि, पाहुणे बोलावले तर मोजून ५०० चं, आहेर दिला तर मोजून १०१, हनीमून केला तर तो पण ६ दिवस आणि ७ रात्रच, मुलं जन्माला घातली तर ती पण समान अंतरानेच, नावंही ठेवली तरी एकाच अक्षरावरून किंवा एकाच सुरातली. माझ्या ओळखीच्या एकाच्या मुलींची नावं आहे शर्मिष्ठा,उर्मिष्ठा आणि कनिष्ठा. बरं झालं चौथी नाही झाली नाही तर मंगलाष्ठाकाच होती. मंगलाष्ठाका मध्ये 'ष्टा' नाही तो 'ष्ठा' आहे. 'ष्ठा' चा उच्चार म्हणजे जीभ सरळ पुढे नेऊन, तोंड वासून, 'ष' साठी तोंडातून हवा सोडणं, सगळं कसं एकापाठोपाठ एक. मुलाची जन्मवेळ सुद्धा लोक मिलीसेकंदा मध्ये मोजतात. हा आता डोकं बाहेर आलं..आता एक हात..एक पाय. हा आताच्या ह्या मिलीसेकंदाची वेळ म्हणजे याची जन्मवेळ , सकाळचे ९.१२.३०.२५६. बोललं तर ते पण जीभ टाळ्याला न लागता मोजूनमापूनच बोलणं. त्यात एकदा दोनदाच हसणं, हसणं सुद्धा असं की दाताचं आणि गालावरच्या खळीच दर्शन दुर्मिळ व्हावं. चहा घेतला तर तो पण अर्धा कपच...तो पण कपानेच पिणं. बशी आपली कपाच्या बुडाला लावायला फक्त. जेवलंच तर ते पण कॅलरीज पाहून. जेवणातही अर्धी वाटी भात, १ वाटी डाळ, भाजी आणि २ चपाती, पापड, डाव्या बाजूला लोणचं आणि उजव्या बाजूला मीठ, बाजूला ठेवलेला तांब्या, त्याच्यावर ठेवलेला पेला. जेवताना पापड खाताना आवाज न येण्याची घेतलेली काळजी. अहो एवढंच काय संडासला बसल्यावर सुद्धा 'आवाज' येणार नाही म्हणून सोडलेला फ्लश. मनमोकळेपणाने लोक काहीच का बरं करत नाहीत ? एवढं कसं काय लोक मन मारुन, नियमातच जगतात अगदी काटकोनासारखं, ९० अंशाच्या कोनातच वळणारं !

त्याच्यामुळेच मला सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे, घाटातले नाहीतर नदीच्याच कडेकडेचे रस्ते आवडतात, त्यांना माहीत नसते रेघ. अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला आणि पारंब्याने भरलेला. एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा, भिरभरणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते.
माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊनच !

-अजय

30 comments:

  1. अप्पुन भी ऐसाच हय... एकदम कलंदर.
    मस्त लिहिले आहेस.

    ReplyDelete
  2. जबरदस्त. अगदी अप्रतिम.. ईनोदी सुरुवात करून शेवटी दिलेला टच अप्रतिमच !!

    ReplyDelete
  3. अजय, छानच झालंय आजचं लिखाण...अगदी तुझ्या ब्लॉगच्या नावासारखं..बेधुंद...:)

    ReplyDelete
  4. पुढे काय झालं भावा?? पाहुणे येती घरा की निघूनी गेले आपुल्या दारा?

    ReplyDelete
  5. सही है भाई, एकदम झकास

    ReplyDelete
  6. कसलं जबरा लिहलं आहेस मित्रा. पद्धतशीरपणाची सकाळी उठल्यापासूनची ते 'आवाजा न करण्या'पर्यंत सगळी लक्षणं अगदी शॉलीड बारकाईने टिपली आहेस. पुन्हा एकदा दाद दिल्याशिवाय राहावत नाहीये. एकदम झक्कास!!!

    ReplyDelete
  7. Ajay,

    Mast zala aahe re post.. khup aavdhala :-)

    ~ Pravin

    ReplyDelete
  8. sahich !!
    mast zhali ahe re post .....
    kahi lok itake formal kase rahu shaktat te tech jaano ...

    afterall, its 'free expression' that matters than the 'good impression' !!

    (waril wakya 1ka English movie madhun dhapale aahe :P)

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. @पंकजः हो का म्हणजे तू ही माझ्यासारखाच का, चुरगाळलेला ? :-)
    @ह्रेरंब, अपर्णा, आनंद, मुग्धा : खुप धन्यवाद. माझ्या विस्कटलेलेपणाला दाद देऊन तुम्ही त्याला खतपाणीच घालत आहात बरं का :-)
    @साधकः पाहूणेच ते, आले बी न गेले बी.
    @बाल सलोनी: बेधुंद वर मनापासुन स्वागत, असेच येत रहा पुन्हा पुन्हा.

    ReplyDelete
  11. अजय, वरची कमेंटच दोन भाषांमध्ये लिहिली आहे त्यावरुनच समजून घे आता.

    ReplyDelete
  12. @सिद्धार्थः हम्म निरीक्षण असेन ही पण मला त्या गोष्टींचा विट ( विट की वीट ?) येतं. अजूनही अशा बरयाच गोष्टी असतात आयुष्यात ज्याना आपण अशाच उपभोगायच्या सोडून नियमात अडकवितो. नियम आनंद देण्यासाठी नसतात या मताचा मी आहे. आपलं आयुष्य मो़कळेपणाने जगला मोकळेपणाने जगला तर जगलात.

    -अजय

    ReplyDelete
  13. @प्रविणः धन्यवाद, तुझ्या प्रतिक्रिया हुरुप वाढवतात.
    @विशाल पाटीलः चांगलं वाक्य आहे रे, आवडलं एकदम. फॉर्मल राहण आणि फॉर्मल जगण दोन्ही वेगळं. नियमात अडकवू नका या देहाला ज्याच आयुष्य फक्त ५० वर्षे आहेत. फळ कधी तुम्ही काटकोनात कापून, सारख्या आकाराच्या फोडी करुन खाता का , नाही ना. मग आयुष्यसुद्धा असंच जगा.

    -अजय

    ReplyDelete
  14. @पंकज : हो रे घेतलं समजून :-), बाय द वे, दोन्ही भुंगे कुठे आहेत का अडकले बागेतल्या फुलांत :-). तू होतास तिथे म्हणून विचारलं.

    अजय

    ReplyDelete
  15. अजय, मस्तच झालीय रे पोस्ट. थोडी चाकोरी हवीच जीवनात पण काही लोकांचे अतीच असते प्रकरण. त्या चाकोरीच्याच प्रेमात पडलेले जीव.छोट्याछोट्या आनंदानाही मुकतात बिचारे.निरिक्षण सहीच आहे आणि शेवटच्या ओळी भावल्या. बाकी फळेही काटकोनात कापून खाणे म्हणजे..... हा हा....

    ReplyDelete
  16. भाग्यश्री: छोटे छोटे आनंदच जीवन सुखी करतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे चाकोरी हवी पण चाकोरीनेच जर तुमच्या जीवनशैली मात केली तर मग चाकोरीबद्ध आयुष्य तुम्हाला कसं आनंद देईन.

    -अजय

    ReplyDelete
  17. काही लोकांची शिस्तबद्धता उरात धडकी भरवणारी असते. त्यांच्यासाठी जगणं म्हणजे वेळापत्रकाप्रमाणे काम करणं. अशा लोकांबरोबर एकदा सहलीला जाऊन बघ. जाम मजा येते.

    ReplyDelete
  18. तुझ्या ब्लॉगचं विजेट बनव लवकर. मला माझ्या ब्लॉगवर टाकायला हवं आहे.

    ReplyDelete
  19. ajay maharajancha vijay aso.aapan parat ekada bouncer bowl war apratim sixer marnyachi kimaya keli aahe.asech sixer marat raha.

    ReplyDelete
  20. कांचन ताई: अशा लोकांबरोबर सहलीला जाण्याचा नाही योग आला अजून पण आजुबाजुला असे अनेक लोक आहेत त्यामुळे अनुभव चांगलाच आहे.

    -अजय

    ReplyDelete
  21. @लायनक्स वर्ल्डः सिक्सर कसला रे :-), मी नेहमी स्ट्रेट डाईव्ह खेचत असतो.

    -अजय

    ReplyDelete
  22. घरी आलेल्या पाहुण्यांच पुढे काय झाल ते सांगायच राहून गेल :) पण भारी, एकदम बिनधास्त लेख, आवडला आपल्याला.

    ReplyDelete
  23. पाहुण्यांची लवकरच एक वेगळी पोस्ट टाकावी लागेन असं वाटतय :-)))

    बरेच दिवसानंतर आलात ब्लॉगवर, असेच येत रहा वरचेवर.

    -अजय

    ReplyDelete
  24. Sahi re... zakkas lihtos... i will follow you regularly... Marathi blog vachtana manapasun ananad mala pahilyanda cha zala.. great yar.. keep it up... cheers for our MATRUBHASHA... Amrutat he painja jinke... cheers.

    ReplyDelete
  25. ...sush....
    khup apratim lihaly....
    mala pan saral reshet jagayla avdat nahi...
    khup khup khup aavdla tuza lekh...

    ....SUSh....

    ReplyDelete
  26. Ajay.........This is one of the best blog I'd ever gone across!keep posting such a nice things.......

    ReplyDelete
  27. MALA HI NAHI AAVDAT....JEVHDHYAS TEVHDA VAGAYLA........MI BADBAD KARAYLA LAGLI KI BADBADACH KARAT RAHTE......AANI STUDYCHA MOOD ASEN TAR........KITIHI VEL STUDY
    MALA HI POST AAVADLI

    ReplyDelete