Monday, January 11, 2010

संवाद म्हणजे...

माणसाचा चेहरा बरयाच वेळेला खुप काही सांगून जातो. कोण म्हणतं की संवाद फक्त बोलूनचं साधता येतो. बोलके डोळे, बोलका चेहरा एवढंच काय स्पर्श ही सारी संवादाचीच तर माध्यमं आहेत. ज्या गोष्टी शब्दांद्वारे पुढच्याला सांगता येत नाहीत त्या चेहरयावाटे कुठेतरी बोलून जातात. चेहरयावरची एखादी सू़क्ष्म छ्टासुद्धा एखाद्याच्या मनातला काय चाललाय हे सांगते. संवाद साधणं ही एक कला आहे असं लोक म्हणतात, मी मात्र याच्याकडे एक अनुभव म्हणूनच पाहतो. आयुष्यभर घेतच रहावा असा अनुभव. प्रभावी संवाद साधणं याला मी कला म्हणेन. नुसतंच भारमभार बोलणं म्हणजे संवाद नाही. आपलं म्हणण दुसरयाच्या मनाला जाऊन थेट भिडणं आणि समोरच्याला अजुन काही ए॑कण्यासाठी आतुर करणं म्हणजे संवाद. संवाद म्हणजे फुलणं, संवाद म्हणजे मोहरणं आणि संवाद म्हणजेच विरघळणं !

मी जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलतो तेव्हा माझा पहिला प्रयत्न हाच असतो की ते बोलणं म्हणजे एक सहजसुंदर साधलेला संवादच ठरेन. बोलून बोलायचंच आहे तर गोडच बोलावं ना मग. आपलं आयुष्य ते किती इन मिन ५० वर्षे. त्यातली निम्मी तर गेली. मग इथून पुढचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक शेवटचा दिवस आहे असं मानून मी प्रत्येकाशी अगदी मनमो़कळेपणाने बोलण्याचा, थोडक्यात संवाद साधण्याचाच प्रयत्न करतो. एखाद्याच्या मनातलं ओळखणं कुणाला कधीच शक्य नसतं. पण निरीक्षण करुन अंदाज बांधणं सहज शक्य आहे. माझ्याशी बोलायला एखादा जण समोर बसला की मी माझी सारी हत्यारं काढून माझं काम सुरु करतो. समोरच्याचे सगळे हावभाव टिपण्यापासून ते बोलताना त्याच्या शरीराची होणारी हालचाल या सारया गोष्टी मी माझ्या मेंदूत अगदी साठवून ठेवतो. समोरच्याच्या विश्वात मग माझी त्याच्या नकळतच एन्ट्री होते. तो माझ्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा मी त्याच्या चेहरयामागच्या चेहरयाशी खेळत असतो. तो चेहराच मला जाणून घ्यायचा असतो. एकाचवेळेस असे कित्येक 'मी' तयार होतात आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात डोकावत राहतात. संवाद साधताना या सारया गोष्टी कराव्याच असं नाही पण समोरच्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला कुतुहल असेन तर तुम्ही हे सारं नकळत करता आणि माझं कुतुहल प्रत्येक चेहरयासाठी जागं होऊन मला हे करायला लावतं.

काल अशाच काही नवीनच भेटत असलेल्या लोकांशी बोलत असताना माझ्या मनात उमटलेल्या तरंगांना कागदावर उमटण्याचा केलेला हा एक प्रयत्न. समोरच्याला व्यक्ती आपल्यात हरवून जाण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याच्या विश्वात हरवून जावं लागतं. अशा कित्येक व्यकतींमध्ये जेव्हा तुम्ही हरवून जाता, छोट्याशा का होईना पण त्या दोन मिनीटांच्या संभाषणामध्ये जेव्हा तुम्ही त्यांचं आयुष्य जगता तेव्हाच संवाद हा एक अनुभव आहे असं मी का म्हटलो ते समजेन.

(...डायरीच्या पानांतून)

-(निशब्द!) अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. च्या आयला
. फुंकर
. मी आणि माझी फिल्लमबाजी
. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

18 comments:

  1. अरे सहज सुंदर संवाद साधण्यासाठी प्रत्येक हालचाली टिपशील व पोरिंना भलता संशय आला तर "नजर वाईट आहे मेल्याची !" असं ही म्हणतील केव्हा !! :) तेव्हा जरा बचके. :P

    ReplyDelete
  2. खरंय! शब्दांविनाही कुणाचा चेहरा खुप काही सांगुन जातो...

    ReplyDelete
  3. संवाद हा शब्दातीत असतो हे खरेच. कधी कधी माणूस बोलत एक असतो अन त्याचे डोळे वेगळेच काही सांगत असतात.छान लिहिलेस रे.मुळात संवाद साधताना आपल्या मनात समोरच्या व्यक्तिविषयीचे एक मत तयार असते ते पुसून टाकून आपले मन मोकळे-स्वागतार्ह करू शकलो तर सहज संवाद होऊ शकतो.अर्थात हे वेळोवेळी जमेलच असे नसले तरी निदान जाणीवपूर्वक प्रयत्न करता नक्कीच येईल.
    बाकी तुझ्याशी बोलताना जपूनच राहायला हवे....हा..हा...

    ReplyDelete
  4. अजय तुझ्याही अतंरंगात डोकावल्यासारखं वाटतंय...मात्र या सर्व संवादाशी तुझं ते 'फ़क्त ५० वर्षांच आयुष्य' हा उल्लेख जरा चटका लावतं....

    ReplyDelete
  5. अजय दादा...
    खूपच सूक्ष्म निरीक्षण करतोस !!
    छान संवाद पण साधतोस..
    मग तू तर जनसंपर्क अधिकारी बनायला पाहिजे होतास.. !!

    ReplyDelete
  6. साधकः असं होतं कधीकधी, पण मी दूरच निरीक्षण जास्त करत नाही. तसं मुलींच निरीक्षण करुनही तुम्ही त्यांना कधीच ओळखू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. :-)

    -अजय

    ReplyDelete
  7. आनंदः जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा चेहरा खुलतो आणि बोलतोही.

    -अजय

    ReplyDelete
  8. प्रवीणः धन्यवाद, डायरीची एकेक पाने अशीच लिहीत जावं असं वाटतं. ब्लॉग वर लेख लिहीण्यापेक्षा मी डायरीत जास्त रमतो. माझं मन मला त्या १०० पानांच्या डायरीतच मोकळं करायला आवडतं,अगदी बेधुंद होऊन.
    अशीच भेट देत रहा !

    ReplyDelete
  9. भाग्यश्री: अगदी बरोबर म्हणालीस. आपलं एखाद्याबद्दलच पुर्वीचं मत पुसुन संवाद साधता यायला हवा. पण हे खरंच खुप कठीण काम आहे. मी असा प्रयत्न करुन पाहिला आहे पण नाही जमला. तूम्ही काळजी करु नका कारण असा प्रयोग मी तुमच्यावर नाही करणार. तुमच्या खाऊगल्ली वर जाऊन थोडी पेटपूजा करुन येतो बरं का आता.

    -अजय

    ReplyDelete
  10. अपर्णा: खरं आहे ना ग ते, आयुष्य ते किती आपलं, तेवढंच. त्यातही या देहाला किती सोसावं लागतं ना. जाऊदेत तू आपलं भटकंती एन्जाय कर. :-)

    -अजय

    ReplyDelete
  11. मंदारः जनसंपर्क अधिकारी पेक्षा मी राजकारणात जाऊन लोकांशी संपर्क साधेन. राजकारणात मी कधीतरी जाईनच असं माझ्या भविष्यात आहे असं काहीजण म्हणतात :-)

    -अजय

    ReplyDelete
  12. मस्तच लिहिलयस .. संवाद म्हटलं की मला फक्त एकच आठवतं "कोशिश" !!! संवादाचं महत्व अत्यंत प्रभावी रीतीने मांडणारा चित्रपट.

    ReplyDelete
  13. मस्तच... संवाद साधन्याची कला आम्हीही शिकू आता. नवीन भेटले तर मी बोलणॅ टाळतोच...
    आता सुधारना करू पाहतोय.

    ReplyDelete
  14. नटरंगचं पोस्ट डिलीट केलंस ? का रे?

    ReplyDelete
  15. हेरंबः अरे रोजनिशी म्हणून एक वेगळाच सेक्शन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय...
    -अजय

    ReplyDelete
  16. साळसूद पाचोळा: मी तर नवीन माणसाशी जास्त बोलतो किंबहुना मला तेच आवडतं. धन्यवाद !

    -अजय

    ReplyDelete
  17. हेरंबः कोशिश सिनेमा पाहिला नाही पण आता तो आर्वजुन पाहीन.

    -अजय

    ReplyDelete